अकोला : अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर कृत्रिम पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवले असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी स्टँडबाय यंत्रणा उभारावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा अकोला महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश देव यांनी केली आहे.
शहरात सलग चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे आधीच विस्कळीत असलेले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक भागांत सहा दिवस, काही ठिकाणी आठ दिवस, तर काही परिसरात तब्बल दहा दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वसामान्य कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. (Akola Water Crisis)
Also Read : लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान
महानगरपालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतांश हायड्रंट बंद असल्यामुळे ही व्यवस्था प्रभावी ठरत नाही. सध्या शहरातील केवळ एकच खाजगी हायड्रंट कार्यरत असून त्याद्वारे संपूर्ण अकोला शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याची टीका निलेश देव यांनी केली. इतक्या मोठ्या शहराचा पाणीपुरवठा एका यंत्रणेवर अवलंबून ठेवणे अत्यंत धोकादायक आहे.
त्यामुळे महान जलशुद्धीकरण केंद्रात पर्यायी ट्रान्सफॉर्मर, बॅकअप वीजपुरवठा, कायमस्वरूपी स्टँडबाय व्यवस्था आणि आपत्कालीन संचालन प्रणाली तातडीने कार्यान्वित करावी, अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय, दरवर्षी होणाऱ्या देखभाल (मेंटेनन्स) कामांचे वैज्ञानिक आणि वेळबद्ध नियोजन करण्यात यावे. एक्सप्रेस फीडर उपलब्ध असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब असून, यासंदर्भात महानगरपालिका, महावितरण आणि संबंधित तांत्रिक विभागांची उच्चस्तरीय संयुक्त आढावा बैठक तातडीने बोलावावी, अशीही मागणी त्यांनी केली. (Akola Water Crisis)
Also Read : विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन
महानगरपालिकेकडे मालमत्ता कर विभागामार्फत नागरिकांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध असतानाही पाणीपुरवठ्यातील अडचणी, दुरुस्तीचा कालावधी, पर्यायी व्यवस्था आणि सुधारित पाणीपुरवठा वेळापत्रक याबाबत एसएमएस किंवा इतर माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जात नाही. नागरिकांना अंधारात ठेवून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असेही निलेश देव यांनी स्पष्ट केले. अकोलेकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निलेश देव यांनी दिला.
जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव
अकोला : अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला...
Read moreDetails





