Mumbai : पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटच्या माध्यमातून जनमताचा आदर करण्यास सांगितले आहे. “ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी स्पष्ट मागणी आंबेडकरांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना म्हटले की, आम्ही विविध माध्यमांतून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या विषारी डावपेचांबाबत वेळोवेळी सावध केले होते. मात्र, त्यांनी आमच्या इशाऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या जनतेने सध्याचा जनादेश दिलेला नाही आणि त्यांनी या जनमताचा आदर राखायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
घटनेचा हवाला देत आंबेडकर पुढे म्हणाले की, संक्रमणकालीन काळजीवाहू व्यवस्थेचा काळ संपल्यानंतर ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणताही थेट घटनात्मक उपाय उपलब्ध नाही. त्यामुळे लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली टाळण्यासाठी त्यांनी तातडीने राजीनामा देणे गरजेचे आहे. भाजपच्या रणनीतीला वेळीच न रोखल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला ममता बॅनर्जी यांची कार्यपद्धती जबाबदार असल्याचे संकेतही आंबेडकरांनी आपल्या विधानातून दिले आहेत.




