भुवनेश्वर : व्यवस्थेच्या क्लिष्ट नियमांनी आणि बँकिंग यंत्रणेच्या अमानुष वर्तनाने एका गरीब आदिवासी भावाला इतकं हतबल केलं की, त्याने आपल्या मृत बहिणीचा सांगाडाच बँकेत आणून “हा पुरावा आता तरी माझे पैसे द्या” अशी आर्त हाक दिली. ओडिशातील केओंझार जिल्ह्यात घडलेली ही घटना केवळ हृदयद्रावक नाही, तर संवेदनाहीन व्यवस्थेच्या तोंडावरचा चपराक आहे.
केओंझार जिल्ह्यातील पटना ब्लॉकमधील मल्लीपासी येथील ओडिशा ग्रामीण बँकेत जीतू मुंडा नावाचा आदिवासी नागरिक आपल्या मृत बहिणी कालरा यांच्या सांगाड्यासह पोहोचला आणि एकच खळबळ उडाली. कालरा यांच्या खात्यात १९ हजार ३०० रुपये जमा होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. पती आणि एकुलता एक मुलगा आधीच मृत्यूमुखी पडल्याने जीतू हेच त्यांचे एकमेव जिवंत नातेवाईक आहेत.
बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी जीतू काही दिवसांपूर्वी बँकेत गेले होते. मात्र मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसदाराचा दाखला आणा, असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. अशिक्षित, गरीब आणि कागदपत्रांविना जगणाऱ्या आदिवासी माणसासाठी ही प्रक्रिया अशक्यप्राय होती. पण बँकेच्या यंत्रणेला त्याची वेदना कळली नाही.
अखेर व्यवस्थेच्या दगडी भिंतीवर धडक देण्यासाठी जीतू यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी बहिणीची कबर उकरून अवशेष बाहेर काढले, ते कापडात गुंडाळले आणि तीन किलोमीटर रणरणत्या उन्हात खांद्यावर घेऊन बँकेपर्यंत चालत पोहोचले. “खातेधारकाला घेऊन या” या बँकेच्या निर्ढावलेल्या उत्तराला त्यांनी अक्षरशः सांगाडाच उत्तर म्हणून आणला.
हे दृश्य पाहून बँकेत उपस्थित नागरिक संतप्त झाले. “कागदांपेक्षा माणुसकी मोठी असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत ग्राहकांनी बँक प्रशासनाला धारेवर धरले. गावच्या सरपंचाची शिफारस, स्थानिक पडताळणी किंवा मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेता आला असता, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात माणुसकीच्या भूमिकेतून हस्तक्षेप करण्याचं आश्वासन दिलं आहे.
ही घटना केवळ एका आदिवासी भावाच्या हतबलतेची नाही, तर गरीब, आदिवासी आणि वंचितांना आजही व्यवस्था कशी कागदपत्रांच्या कुंपणात अडकवते, याचं विदारक वास्तव आहे. संविधान समानतेची हमी देतं; पण व्यवहारात माणुसकीच हरवली, तर अशा सांगाड्यांनाच पुरावे बनून फिरावं लागतं हीच या घटनेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.






