– राजेंद्र पातोडे
आध्यात्मिक अधिकाराचा गैरवापर करून मोक्ष आणि व्याधी मुक्ती करण्याचे नावावर महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे सारखेच ‘पॅटर्न’ आपल्याला अशोक खरात आणि अकोल्यातील शुकदास महाराज या दोन्ही घटनांमध्ये दिसून येते. दोन्ही ठिकाणी तु माझी मागील जन्मी बायको होतीस किंवा देवाचा अवतार समजायचा आणि ‘शुद्धीकरण’ करण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केले गेले होते.
येथे या दोन्ही प्रकरणांतील साधर्म्य कमालीचे चक्रवणारे आहे. एकीकडे अशोक खरात स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घ्यायचा आणि त्याने स्वतःचा एक वेगळा संप्रदाय निर्माण केला होता. त्याच्या शोषणाची पद्धत अत्यंत विचित्र आणि भयानक होती. तो कथित मंत्रांचा वापर करायचा. पीडित महिलांना जवळ बोलावून त्यांच्या कानाजवळ काही मंत्र पुटपुटायचा ज्याला तो ‘गायत्री मंत्र’ किंवा गुप्त मंत्र म्हणायचा. मंत्र पुटपुटताना तो हातातील पेढा किंवा प्रसाद खायला द्यायचा. संमोहन किंवा मानसिक दहशतीचा वापर करून तो महिलांना विवस्त्र व्हायला लावायचा. शिवाय तो स्वतःला देवाचा अवतार समजायचा आणि ‘शुद्धीकरण’ करण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करायचा. आता कुठे तपास सुरू झाला आहे अजून काय काय बाहेर पडणार आहे याची खात्री देता येत नाही.
असेच शुकदास महाराज प्रकरण अकोला जिल्ह्यात उघडकीस आले होते. अकोल्यातील शुकदास महाराज याचे प्रकरण श्याम मानव आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अत्यंत धाडसाने उघडकीस आणले होते. शुकदास महाराज देखील महिलांना ‘मोक्ष’ मिळवून देण्याच्या किंवा व्याधीमुक्त करण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढायचा. तु मागच्या जन्मी राधा होती. तिथेही मंत्र-तंत्र आणि प्रसादाचा वापर करून महिलांचे लैंगिक शोषण केले जात असे. असा आरोप त्यावेळी श्याम मानव ह्यांनी केला होता. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ह्यात शुकदास महाराज ह्याचे ड्रायव्हरची भूमिका महत्वाची होती.
शुकदास महाराजच्या ड्रायव्हरने दिलेली साक्ष आणि त्याने पुरवलेली माहिती या प्रकरणात सर्वात कळीची ठरली. महाराजांच्या आतल्या गोटात काय चालते, हे त्याने पुराव्यासह समोर आणले होते. श्याम मानव यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना केवळ कायदेशीर लढाईच लढली नाही, तर अशा भोंदू बाबांच्या ‘चमत्कारां’ मागचे विज्ञान उदा. नजरबंदी, हातचलाखी लोकांसमोर उघड केले होते.
या प्रकरणांमधील महत्त्वाचे साम्य या दोन्ही भोंदू बाबांच्या कार्यपद्धतीत काही गोष्टी समान होत्या. भक्ताला आधी असे पटवून देणे की त्यांच्यावर खूप मोठे संकट आहे आणि फक्त ‘महाराज’ किंवा ‘बाबा’च त्यांना वाचवू शकतात. त्यात एकांत आणि गोपनीयता असावी हे ठरविले जाई. मंत्र सांगण्याच्या बहाण्याने महिलेला एकांतात बोलावणे.
धर्माच्या आणि विटाळाच्या नावाखाली पीडितेच्या मनात भीती निर्माण करणे, जेणेकरून ती कोणाकडे तक्रार करणार नाही.
या घटनांमुळेच पुढे महाराष्ट्रात अंनिसच्या माध्यमातून जादूटोणा विरोधी कायदा अधिक कडक करण्याच्या मागणीला जोर मिळाला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे किती गरजेचे आहे, हेच या प्रकरणांमधून स्पष्ट होते. श्याम मानव यांनी १९८० च्या दशकात जेव्हा शुकदास महाराजला एक्सपोज केले, तेव्हा आजच्यासारखा कडक ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अस्तित्वात नव्हता. त्यामुळे, भोंदू बाबांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना ‘ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट’ यांसारख्या इतर कायद्यांचा आधार घ्यावा लागला होता.
पुढे ह्या शुकदास महाराज केसचे काय झाले, त्याची माहिती पब्लिक डोमेन मध्ये नाही. मात्र त्याकाळी खूप गदारोळ झाला होता. खुले नाट्यगृह अकोला येथे प्रा श्याम मानव यांनी शुकदास महाराज एक्सपोज करण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्याला प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि काही पक्ष संघटना ह्यांनी श्याम मानव यांच्या व्याख्यानाला केलेला विरोध आणि शुकदास महाराज विरुद्ध बोलण्यास न्यायालयाचा मनाई आदेश ट्रस्टीनी चक्क स्टेज वर आणून दिला होता. श्याम मानव यांनी तो लिफाफा शांतपणे स्वीकारला आणि थेट खिशात टाकून आता मी आणि न्यायालय पाहून घेऊ असे म्हणत पुढे तीन तास हा सर्व जाती धर्मातील बाबा महाराज एक्सपोज केले होते. अर्थात शुकदास महाराज ह्यांचे बाबत देखील श्याम मानव यांनी दीड तास माहिती दिली होती.त्याचा मी देखील पत्रकार म्हणून साक्षीदार होतो.






