बीड (गेवराई तालुका): गेवराई तालुक्यातील सुर्डी गावात गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान बालकांना बेदम मारहाण करण्यात आली असून, अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरे पाडून नुकसान केले नाही, तर घरातील संसारोपयोगी साहित्यही फोडून टाकले. शेतातील तब्बल सहा बोअरवेल दगडांनी भरून बुजवण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत मिळालेली घरकुलेदेखील जमीनदोस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या अमानुष मारहाणीत एका तरुण मुलीला गंभीर दुखापत झाली असून, ती सध्या बीड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहे. तसेच, पीडित कुटुंबांतील मुलांना शाळेत जाण्यास मज्जाव केला जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच शनिवारी (दि. २१) वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्यप्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह सुर्डी येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आदिवासी आणि पारधी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबांना तातडीने संरक्षण व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.






