पिंपरी: पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्राची औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते, पण या शहराच्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरी रेल्वे स्थानकाची अवस्था मात्र बिकट झाली आहे. रोज हजारो महिला प्रवासी येथून प्रवास करतात, मात्र त्यांना किमान मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.
पिंपरी रेल्वे स्थानकावरील महिलांचे स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. पुण्यात किंवा लोणावळ्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या हजारो महिलांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रवास करताना स्वच्छतागृह बंद असणे ही महिलांसाठी मोठी समस्या आहे, अशी खंत महिला प्रवाशाने व्यक्त केली. सुरक्षेच्या बाबतीतही पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी स्थानके वाऱ्यावर आहेत. या ठिकाणी आरपीएफ (RPF) जवानांचा पत्ता नसून, भिक्षेकरी आणि मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्थानकातील बाकड्यांवर भिक्षेकऱ्यांनी ताबा मिळवल्याने प्रवाशांना गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागते.
मद्यपींच्या वाढत्या वावरामुळे महिला प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. तसेच स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा आणि राडारोडा पडलेला आहे. स्वच्छतागृहे बंद असल्याने अनेक जण उघड्यावर लघुशंका करतात, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे इथे पूर्णपणे धिंडवडे निघताना दिसत आहेत. तहानलेल्या प्रवाशांना नळांना पाणी मिळेना. स्थानकात प्रवाशांसाठी चार ते पाच ठिकाणी नळ बसवण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या नळांना पाणीच येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना खाजगी दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे. या सगळ्या समस्यांकडे प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण
-प्राचार्य डॉ धैर्यवर्धन पुंडकर भारतात दोन वृत्ती कायम बघायला मिळतात एक उदात्त हेतू साठी धर्म जात विसरून लढा उभारणे आणि...
Read moreDetails






