जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत. कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर आत्महत्येचे संकट वाढत आहे.
या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही, तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाव्दारे सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- जालना जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
- शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी.
- शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, रामप्रसाद थोरात, चोखाजी सौंदर्य, गोवर्धन जाधव, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे, मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, नानाभाऊ डोळसे, सुभाष आधुडे, दिलीप मगर, नितीन मगर, अविनाश गाडेकर, संघर्ष पंडित, गौतम भालमोडे, गौतम मगर आदीसह स्वाक्षऱ्या आहेत.