Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

मल्ल सुशील कुमारचा कुटिल डाव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 31, 2021
in विशेष
0
मल्ल सुशील कुमारचा कुटिल डाव
       

पैलवान सागर धनखड़ च्या हत्याकांडात भारतासाठी दोनवेळा ऑलम्पिकची पदकं जिंकून आणणारा पैलवान सुशील कुमारला काल अटक झाली. या घटनेने जगाच्या पातळीवर देशाच्या इभ्रतीला एकप्रकारे तडाच गेला. ‘आपणच सर्वश्रेष्ठ आहोत आणि आपल्या सर्वश्रेष्ठतेला कोणीही आव्हान बनू नये” या अहंकाराने आणि भयगंडाने ग्रासल्यावर एखाद्याची काय अवस्था होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुशील कुमार हा पैलवान आहे. कोणतीही स्पर्धा अंतिमतः विकृतीचे रूप धारण करते. कपट कारस्थान जन्माला घालते. खरंतर विद्या कोणतीही असो, शक्ती कोणतीही असो…त्यास जर विनयशीलतेची जोड नसेल तर त्याचा नाश हा हमखास ठरलेला आहे.

कोणत्याही खेळाडू कडे नुसता खेळ असून भागत नाही ,तर त्याच्याकडे खिलाडूवृत्ती असणं फार गरजेचे असते. याबाबतीत सुशील कुमार पाक नापास झालेला दिसून येतो. सुशील कुमारच्या पतनाचा आलेख हा जलस, द्वेष, मत्सर, खुन्नस यामार्गे खूनाचा आरोप होण्यापर्यंत चढतच गेलेला आहे. सुशील कुमार हा नेहमीच वादग्रस्त, हिणकस आणि खुनशी वर्तनाने कुप्रसिद्ध राहिलेला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला प्रकाशझोत टाकता येईल.

2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये सुशील कुमारने रौप्य पदक जिंकले होते. त्याच्या स्पर्धेत भारतासाठी ब्राँझ पदक जिंकणाऱ्या योगेश्वर दत्त सोबत ही सुशील कुमार ने भांडण केले. परिणामी योगेश्वर दत्त ने छत्रसाल स्टेडियम सोडून दिले. लंडन ऑलम्पिक नंतर सुशील कुमारच्या अहंकारी व्यवहाराला कंटाळून त्याचा प्रशिक्षक रामफल यांनीसुद्धा त्याची साथ सोडून दिली.

2016च्या रियो ऑलम्पिकवेळी 74 किलो वजनी गटात भारताकडून सुशील कुमार आणि नरसिंह यादव हे दोन प्रबळ दावेदार होते. ऑलम्पिक पात्रता स्पर्धेत नरसिंह यादव यशस्वी झाला आणि त्याने त्याचे ऑलम्पिक तिकीट पक्के केले त्यावेळी दोन वेळा ऑलम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशील कुमार यादवने नरसिंह यादवऐवजी स्वतःला ऑलम्पिक ला पाठवावे यासाठी कोर्टातही धाव घेतली पण, कोर्टाने त्याची याचिका फेटाळली. त्यावेळी सुशील कुमार नरसिंह यादवविरुद्ध सुडाने पेटला.  नरसिंह यादवने सोनीपत मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) येथे जोरदार सराव सुरू केला. परंतु ,ऑलम्पिक दहा दिवसांवर आलेले असताना नरसिंह यादव National Anti Doping Agency (NADA) च्या उत्तेजक द्रव्य चाचणीत पॉझिटीव्ह आला.

सुशील कुमारने कट रचून नरसिंह यादवच्या जेवणातून उत्तेजक पदार्थ मिसळल्याची तक्रार नरसिंह यादवने सोनीपतच्या राई पोलीस ठाण्यात नोंद केली. परंतु सुशील कुमारला जे अपेक्षित होते तेच झाले. World Anti Doping Agency (WADA) ने नरसिंह यादवला ऑलम्पिक स्पर्धेतून बाहेर केले आणि त्याच्यावर 4 वर्षांची बंदीसुद्धा आणली. ही केस CBI ला देण्यात आली परंतु त्यात विशेष काही तपास झाला नाही म्हणून दिल्ली हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. पण या सगळ्या घडामोडींमध्ये नरसिंह यादवसारख्या उदयोन्मुख पैलवानाचे करियर मात्र बरबाद झाले.

सुशील कुमार त्याला तोड ठरेल अशा प्रत्येक पैलवानाचा काटा काढतच राहिला. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स 2018 साठी दिल्लीत 2017 साली दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये पात्रता स्पर्धा घेण्यात आली होती. या पात्रता स्पर्धेत सुशील कुमारचा सामना प्रवीण राणा या नव्या दमाच्या पैलवानासोबत होता. त्याही वेळी सुशील कुमारच्या सांगण्यावरून प्रवीण राणा आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद झाली. परंतु ,सुशील कुमार हा मोकाटच राहिला.

जितेंद्र कुमार हा पैलवानसुद्धा एकेकाळी सुशील कुमारचा खूप मोठा चाहता होता. परंतु ,जितेंद्र कुमारची चूक ही की, 2019 वर्ल्ड चैंपियनशिपच्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  त्याचा मुकाबला सुशील कुमार सोबत होता. सुशील कुमार इथे ही रडीचा डाव खेळला. या सामन्यात सुशील कुमारने जितेंद्रचे बोट मुरगळून त्याच्या डोळ्यांवर ठोसा मारला. परिणामी ,जितेंद्रला त्या डोळ्याने दिसणं ही कठीण झालं होतं. तशाच अवस्थेत जितेंद्र सुशील कुमारशी लढला. परंतु, त्या सामन्यात सुशील कुमारची खुनशी वृत्ती मात्र उघडी पडली.

अनेक प्रतिभावान पैलवान सुशील कुमारच्या कुटील डावाने बरबाद होत होते. पण ,त्याला लगाम लावणारी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. सुशील कुमारकडून स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी गुन्हेगारी कृत्ये वाढतच चाललेली होती. त्याचा उत-मात काही केल्या थांबतच नव्हता. त्याला वेळीच रोखायला हवे होते पण तसे घडले नाही. परिणामी, मे 2021 मध्ये सुशील कुमार ची मजल पैलवान सागर धनखड याची हत्या करण्यापर्यंत गेली. विशेष म्हणजे सागर धनखडला मारहाण करताना सुशील कुमारने त्याचा मित्राला मोबाईल मध्ये शूटिंग करायला लावले. देशासाठी ऑलम्पिक पदक जिंकणारा मल्ल देशातील एका मल्लाचा खून करतानाचा व्हिडिओ बनवणे हा अधोगतीचा, बेदरकरपणाचा कळसच म्हणावा लागेल. सागर धनखडच्या खूनानंतर सुशील कुमार 20 दिवस फरार होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जमीन नामंजूर केल्यानंतर शेवटी दिल्ली पोलिसांनी त्याला काल अटक केली.

सुशील कुमारचा हा इतिहास बघता सुशील कुमार हा मल्ल जगभरातील खेळाडूंसाठी एक वाईट उदाहरण म्हणून पुढे आलेला आहे. स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याच्या नादात त्याचा माणूस म्हणून झालेला ऱ्हास खूप बोलका आहे. खेळाडूंमधील स्पर्धा, कलाकारांमधील स्पर्धा, राजकारण्यांमधील स्पर्धा, विद्वानांमधील स्पर्धा, शास्त्रज्ञांमधील स्पर्धा… स्पर्धा कोणत्याही क्षेत्रातील असो ती विकृतीला निमंत्रण देते. हे सुशील कुमार प्रकरणात आपल्याला दिसून येते.

सुशील कुमारला गुरू ही खुनशी प्रवृत्तीचाच भेटला. त्याचं नाव सतपाल. नरसिंह यादव च्या डोपिंग प्रकरणात सुशील कुमारच्या गुरूचा म्हणजे सतपाल सिंगचा मोठा हात होता. सतपाल सिंग हा 1982 च्या आशियाई गेम्सचा विजेता. अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित असणारं नाव. सुशील कुमार हा सतपाल सिंग यांचा इतका आवडता शिष्य की त्याच्यासाठी त्यांनी द्रोणाचार्याचीच भूमिका वठवली. या द्रोणाचाऱ्याने सुशील कुमारला आपला जावईच बनवून घेतला. सतपाल ने सुशील कुमारला एकप्रकारे आधुनिक अर्जुनच बनवण्याचा चंग बांधला. हे गुरू-शिष्य दोघेही इतके मग्रूर, गर्विष्ठ की त्यांच्या एकत्र येण्याने अपप्रवृत्तींचा गुणाकारच झाला. त्यांच्या महत्त्वकांक्षा मात्र नरसिंह यादवला मात्र एकलव्य बनवून गेल्या!

यानिमित्ताने भारतातील सांस्कृतिक वर्ण-जातीसंघर्ष पुन्हा एकदा समोर आला. आधुनिक काळात वर्ण-वर्ग-जाती वर्चस्ववादी व्यवस्थेच्या विळख्यात केवळ मल्लविद्याच नव्हे ,तर सर्वच क्रीडाक्षेत्र गुदमरत आहे.

देशातील सर्वच क्रीडा क्षेत्रातील जाती संघर्षाचा आपल्याला वेध घ्यावा लागेल. त्याबद्दल सविस्तरपणे कधीतरी लिहिता येईल. सुशील कुमारच्या निमित्ताने काही काही निरीक्षणे मात्र इथं नोंदवून पुढे जात आहे.

उत्तर भारतातील खेळजगतावर जाटांचे वर्चस्व आहे. त्यामुळे उत्तर भारतात मिरासदार जाट व प्रभुत्वशाली यादव यांच्यातील संघर्ष राजकारणापासून खेळापर्यंत सतत उफाळून येत असतो. वेगवेगळ्या स्पोर्ट्समधील ज्या लॉबी काम करतात त्या प्रामुख्याने  जाती-वर्गाच्या पायावरच उभ्या असतात.महाराष्ट्रात राज्य कुस्ती परिषदेवर मा. शरद पवार निर्विवादपणे अध्यक्ष होऊ शकतात. तसेच क्रिकेटमध्ये BCCI असो की International Cricket Council (ICC) असो अध्यक्षपदापर्यंतची झेप जगमोहन दालमिया किंवा मा.शरद पवारच घेऊ शकतात. त्याचबरोबर अमित शहा यांचे चिरंजीव BCCI चे सचिव होतात लागलीच Asian Cricket Council चे अध्यक्ष होऊ शकतात. यामागे जात-वर्गाचे सूत्र काम करीत असते. अतिशूद्र व मार्जिनल जातींच्या खेळाडूंना कोणत्याही स्पोर्ट्स मध्ये साधा चंचूप्रवेश ही नाकारला जातो. मग, प्रशासनातील संधी तर खूपच दूरची बात. बनिया हे प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा खेळाचा व्यापार करतात. ललित मोदी ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारखी जगातील सर्वात श्रीमंत स्पर्धा उभी करतात यातच सगळं आलं. ब्राह्मण हे स्पोर्ट्सच्या स्वायत्त संस्थांना स्वतःच्या पकड मध्ये ठेवतातच पण त्यांच्या जातीच्या खेळाडूंना नेहमीच रेडकार्पेट आंथरत राहतात. प्रशासक भूमिका ते सहजासहजी सोडत नाहीत. तर मिरासदार व प्रभुत्वशाली जातींमध्ये खुंकार स्पर्धा लागते त्यात मिरासदार बाजी मारतात. हे सुशील कुमार हा नरसिंह यादवचे करियर कशा प्रकारे बरबाद करू शकतो हे साऱ्या जगाने पाहिलेले आहे. दुसरीकडे दोन जाटांतील संघर्ष हा रक्तरंजित होऊन जातो. सुशील कुमार हा जाट आहे आणि सागर धनखड हाही जाटच होता पण यांच्यातील संघर्ष जीवघेणा झाला.

भारतात स्पोर्ट्स जगत हे नेहमीच जातीवादाने, वंशवादाने, भाषावादाने, प्रादेशिकवादाने ग्रस्त आहे. महाराष्ट्रातील मल्लांना उत्तर भारतात मिळणारी वागणूक नेहमीच भेदभावाची आणि उपेक्षेची राहिलेली आहे. याभेदभावग्रस्त वर्तुळात टॅलेंट मात्र राजरोसपणे मारले जाते. आणि 130 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येचा देश ऑलम्पिकमध्ये एका एका पदासाठी तरसत राहतो.

राजर्षी शाहू महाराजांनी केवळ त्यांच्या संस्थानातील किंवा देशातीलच नव्हे ,तर जगभरातील मल्लांचा सन्मान केला. त्यांच्या क्रीडाप्रेमामागे जात्यंतक राष्ट्रवाद कार्यरत होता. तो जात्यंतक राष्ट्रवाद स्वतंत्र भारतात ही आम्ही निर्माण करू शकलेलो नाही. सुशील कुमार प्रकरणाने जी नाचक्की देशाच्या वाटेला आलेली आहे अशावेळी भारतीय क्रीडा क्षेत्राची पुनर्रचना करण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला पाहिजे. ही पुनर्रचना नक्कीच राजर्षी शाहू महाराजांच्या विचार प्रकाशात शक्य आहे!

– सचिन माळी


       
Tags: NADAsachinmaliWADA
Previous Post

प्राथमिक आरोग्य केंद्रे फक्त नावापुरतीच, जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना

Next Post

पिंपरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Next Post
पिंपरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

पिंपरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
बातमी

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

by mosami kewat
January 18, 2026
0

नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...

Read moreDetails
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

January 18, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

January 17, 2026
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

January 17, 2026
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

January 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home