मणिपूर – मणिपूरमध्ये सीबीआयने मैतेई गटाच्या नेत्या अरामबाई टेंगगोलला अटक केल्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. त्यामुळे मणिपूरमधील पाच जिल्ह्यात रवीवारी रात्री इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
याबाबत सीबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शनिवारी रात्री अरामबाई टेंगगोलला ताब्यात घेतल्याच्या बातम्या पसरताच, निदर्शने उसळली. तेव्हा इम्फाळ शहराच्या विविध भागात टायर जाळले आणि रस्ते अडवले. क्वाकीथेल परिसरात सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये चकमक झाली. यावेळी अनेक निदर्शक जखमी झाले आहेत.
मणिपूरचे गृह आयुक्त एन. अशोक कुमार यांनी इंटरनेच सेवा 5 दिवस बंद ठेवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी पहाटे इंफाळ पूर्व आणि पश्चिम, काकचिंग, थौबल आणि बिष्णुपूर या 5 जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले. यानुसार व्हीएसएटी आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत.
तर गृह विभागाने दिलेल्या आदेशात “काही समाजविरोधी घटक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात प्रतिमा, द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यासाठी करू शकतात. ज्यामुळे लोकांच्या भावना भडकतील आणि मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.” असे गृह विभागाने म्हटले आहे.