जामखेड : बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे, देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा रोखठोक सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी आज शासनाला जाब विचारला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि सामान्य नागरिकांचे हाल लक्षात घेऊन त्यांनी जामखेड तालुक्यासह राज्यभर ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि तातडीने मदत देण्याची मागणी केली.
आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने करण्यात आली. ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच घरे, जीवनावश्यक वस्तू आणि हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. “माणसाबरोबर जनावरंही मरण पावली आहेत,” असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.
’आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी’
यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ म्हणाले, “शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.” शासनाने जामखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सोयाबीन, कांदा, फळबागांचे मोठे नुकसान
निवेदनात नमूद केले आहे की, राज्यभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत, तर जामखेड तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला आहे. सोयाबीन, कांदा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी व गोरगरीब लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यासह राज्यभर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निदर्शनावेळी लोक अधिकार आंदोलनाचे बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, आझाद क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव फुले, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, रेश्मा बागवान, कृष्णा मोरे, नागेश फुले, प्रवीण गायकवाड, अनिल कांबळे, योगेश फुले, संदीप सांगळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरीत किवळे-रावेत मेट्रो मार्गाच्या DPR साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि...
Read moreDetails






