पुणे – साखर…साखर म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली गोडी. चहा, फराळ, सणवार, आनंदाचे क्षण…साखरेशिवाय अपूर्णच.
पण ही गोडी…ज्यांच्या रक्ताने, घामाने तयार होते…त्यांच्या आयुष्यात मात्र ही गोडी…एक काळवंडलेलं दुःख बनून राहतं.
कडवट वास्तव, जे फार कमी लोकांपर्यंत पोहोचतं.
बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी महिला कामगाराची गोष्ट…वय फक्त ३२ वर्षं. दोन लहान मुलं. त्यांचं पोट भरायला रोज लढणारी आई. मागच्या वर्षी मासिक पाळीमुळे दोन दिवस काम सोडलं… शरीर थकलं होतं. रक्त गेलं होतं. पण विश्रांती? त्याची किंमत १२०० रुपये. ह्या रकमेचा दंड, तिच्या नवऱ्याने उचल घेतलेली. एक दिवस सुटी मागितली तर मुकादमाचं उत्तर? “पिशवीच काढून टाक… नाहीतर काम सोड.”
त्या एका वाक्यानं तिनं निर्णय घेतला…मुलांचं पोट भरावं म्हणून…कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडावं म्हणून…तिने स्वतःचं गर्भाशय काढून टाकलं.
दुसरी गोष्ट अशीच…अंगाचा थरकाप उडवणारी…वय अवघं २८. गरोदरपणाचा सातवा महिना चालू असतानाही तिला ऊसतोडणीला जावं लागलं. दररोज १५० उसाच्या मोळ्या…डोक्यावरून गाडीत टाकाव्या लागायच्या. एकदा दोरी निसटली… ती खाली पडली. त्याच रात्री तिचा गर्भपात झाला.
दुखवटा? शोक? विश्रांती? नाही. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा फडावर…हातात सत्तोर… डोळ्यात अश्रू ….
एका संस्थेने केलेल्या अहवालात उघड झालेलं हे धक्कादायक वास्तव… फक्त बीड जिल्ह्यात ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली.
त्यातल्या ४७७ महिला ३० ते ३५ वयोगटातल्या. सर्वात जबाबदारीच्या वयात. आई असण्याच्या काळात. हे केवळ एका जिल्ह्याचं चित्र आहे.
राज्यात जवळपास १४ ते १५ लाख ऊसतोडणी कामगार आहेत, त्यातील साडेसात लाख महिला. त्यांचं रोजचं वास्तव काय?
१४-१५ तासांची मजुरी. दिवस, रात्र, थंडी, ऊन याची पर्वा न करता सतत काम…. मासिक पाळी असो, बाळंतपण असो, ताप असो, थंडी असो काम थांबत नाही. थांबलं, तर थेट दंड. ६०० रुपये. शिडीवरून चढणं… दोरी पकडून उड्या मारणं…खाली पडणं… दुखापत… आणि तरीही उद्या पुन्हा तेच. आणि त्यातही स्वच्छतेची कोणतीही सोय नाही. सॅनिटरी पॅड्स खरेदी करायचं साधं स्वातंत्र्य नाही. एका जुन्या कापडाचा वापर, तोच पुन्हा धुवून पुन्हा वापरणं…ज्यातून पसरतो संसर्ग. शरीरात रुतत जातं दुखणं… अन् आयुष्यभर न संपणारा त्रास.
या सगळ्याचं मूळ कुठं आहे?
आर्थिक असुरक्षितता. सामाजिक दुर्लक्ष. आणि व्यवस्थेचा अन्याय. मुलगी १३-१४ वर्षांची झाली, की तिला शाळेतून बाहेर काढलं जातं…
मग तात्काळ लग्न… आणि थेट फडावर. बालविवाहाचं प्रमाण वाढतंय. शिक्षण हरवतंय. साखर कारखान्यांमध्ये शेतीच्या नावाखाली सुरु आहे स्त्रीदेहाचं शोषण. हे सगळं ऐकून आपण गप्प बसणार आहोत का?
नाही. या व्यवस्थेला आरसा दाखवण्याची वेळ आली आहे. वस्तुस्थिती बदलण्याची गरज आहे… आणि ती आज आता आपल्यापासून बदलाची सुरुवात आपल्यापासून करण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकार आणि साखर उद्योगाला याबाबत जबाबदारी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच शोषण करून गलेलठ्ठ झालेल्या साखरसम्राटांची जबाबदारी आहे…राज्यभर ऊसतोडणी कामगार महिलांची नोंदणी झाली पाहिजे. त्यांना सॅनिटरी पॅड्स मोफत मिळायला हवेत. मासिक पाळीच्या काळात सुट्टी मिळायला हवी. आरोग्य तपासणी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा फडावर उपलब्ध असायला हव्यात. गर्भाशय काढण्याचे दुष्परिणाम समजावून सांगणारी जनजागृती सुरू झाली पाहिजे. प्रत्येक फडावर शौचालय, स्वच्छ पाणी, सुरक्षित निवास यासारख्या मूलभूत सुविधा द्याव्या लागतील.
कारण…
साखर गोड लागते, पण तिच्या गोडव्यात विरघळलेलं हजारो स्त्रियांचं दुःख, त्यांचा घाम… आणि त्याग…. या स्त्रियांना आवाज द्या. त्यांची वेदना ऐका. तुमचं मौन त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला मूक संमती देतो…त्यामुळे आता गप्प बसू नका….त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. आणि व्यवस्थेविरोधात आवाज बुलंद करा….कारण या मायमाउलींचे आरोग्य, त्यांची इज्जत… साखरेपेक्षा मौल्यवान आहे!