पुणे : राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसलेली यंत्रणा अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली असून, प्राथमिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होणार आहे. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु होईल. प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार आहे.