राजेंद्र पातोडे
महाराष्ट्र राज्यात २०२५ मध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांसारख्या विविध पदांसाठी अंदाजे १५,६३१ जागांवर भरती सुरू झाली आहे.मात्र ह्या मध्ये अकोल्यासह सात जिल्ह्यात अनुसूचित जाती साठी एकही पद राखीव नसून पाच जिल्ह्यात अनुसूचित जमाती करीता एकही पद राखीव ठेवण्यात आलेले नाही.
तीच अवस्था भटके विमुक्त, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गा बाबत असल्याने ही पोलिस भरती तातडीने रद्द करून आरक्षित जागा सहित नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी गृहमंत्री राज्यपाल आणि पोलिस महासंचालक यांच्या कडे केली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भरती प्रक्रियेत २०२२-२३ आणि २०२४-२५ या कालावधीतील रिक्त पदे भरली जात आहेत, असे भासविले जात आहे. मात्र त्यात अकोला, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, नागपूर लोहमार्ग, अहिल्यानगर, गोंदिया ह्या जिल्ह्यात अनुसूचित जाती उमेदवारासाठी एकही जागा उपलब्ध नाही.
तीच अवस्था अनुसूचित जमाती उमेदवाराची आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर शहर, अहिल्यानगर आणि गोंदिया मध्ये अनुसूचित जमाती पद संख्या शून्य आहे.अनेक जिल्ह्यात भटके विमुक्त, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गा करीता एकही जागा उपलब्ध नाही.
राज्यातील पोलिस भरतीमध्ये आरक्षण अधिनियम लागू असून, तो डावलून राज्य सरकारने ही भरती प्रकिया सुरू केली आहे.
अनुसुचीत जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी ह्यांना दिलेल्या घटनात्मक अधिकाराचे हनन गुह विभाग करीत आहे. ह्याचा निषेध नोंदवत ही प्रक्रिया तत्काळ रद्द करून आरक्षित जागा सहित नव्याने ही प्रकिया सुरू करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देखील वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून सरकारला देण्यात आला आहे.





