नाशिक: “जेव्हा एखादी महिला संघर्षासाठी बाहेर पडते, तेव्हा ती अनेक पातळ्यांवर लढा देत असते. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून समाजाच्या हक्कांसाठी असतो. अशा लढवय्या महिलांचा सत्कार होणे गरजेचे आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सातपूर भागातील सौभाग्य लॉन्स येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भव्य मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता त्र्यंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या मेळाव्यात नाशिकमधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
आपल्या भाषणात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी महिलांच्या सामाजिक आणि राजकीय सहभागावर भर दिला. त्या म्हणाल्या की, महिलांनी केवळ सोहळ्यांपुरते मर्यादित न राहता आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेच्या ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी आणि महिलांचा उत्साह पहायला मिळाला.






