मुंबई : गोवंडी येथील लुंबिनीबाग एस.आर.ए. (SRA) सोसायटीत आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देणाऱ्या अनिल पगारे या रहिवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एस.आर.ए. प्रशासन आणि देवनार पोलीस ठाण्याच्या जाचाला कंटाळून अनिल पगारे यांना आपला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेचे पडसाद उमटताच वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Mumbai News)

नेमकी घटना काय?
लुंबिनीबाग एस.आर.ए. सोसायटीतील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी कायदेशीर लढा देत आहेत. या प्रक्रियेत प्रशासनाकडून होणारी सक्ती आणि देवनार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक यामुळे अनिल पगारे मानसिक दडपणाखाली होते. याच संघर्षात त्यांचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
प्रकाश आंबेडकरांचे तातडीचे आदेश :
या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मिळताच, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांना पगारे कुटुंबाची भेट घेण्याचे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.
आदेश मिळताच मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी लुंबिनीबाग येथे जाऊन पगारे कुटुंबाची सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांनी एस.आर.ए. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे. (Mumbai News)
हक्काच्या घरासाठी लढणाऱ्या एका सामान्य माणसाचा असा बळी जाणे ही लोकशाहीची हत्या आहे. पगारे कुटुंब आज उघड्यावर पडले असून, याला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे चेतन अहिरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात पगारे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






