पुणे : पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर खासगी कंपनीमार्फत चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध करत, शिक्षण क्षेत्रात ‘कंपनी राज’ आणण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे.
खानवडी येथील ‘जोती-सावित्री’ जिल्हा परिषद शाळा ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ या खासगी कंपनीकडे चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. राज्यातील पहिली PPP तत्त्वावरील शाळा म्हणून या प्रकल्पाचा उल्लेख केला जात असला, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणाचे खासगीकरण होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
Also Read : ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन
दरम्यान, या शाळेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. मात्र, फुले यांच्या जन्मभूमीतच शिक्षणाचे व्यापारीकरण सुरू करणे हा त्यांच्या विचारांचा अपमान असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, “महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची दारे खुली केली. त्याच ठिकाणी शिक्षणाचे खासगीकरण करणे ही गंभीर बाब आहे.”
Also Read : पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद
याशिवाय, PPP मॉडेलमुळे शिक्षक भरती व शाळा व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे गेल्यास आरक्षणाच्या नियमांना बगल दिली जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाचे अस्तित्व धोक्यात येईल, असेही आघाडीचे मत आहे.
शिक्षण हा राज्याचा घटनात्मक अधिकार असून तो नफ्यासाठी खासगी कंपन्यांकडे सोपवणे योग्य नसल्याचे आघाडीने स्पष्ट केले आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






