बुलढाणा : जळगाव जामोद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहाचा पोच रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की, विद्यार्थ्यांना मोठे सापदेखील दिसत आहेत. २८ सप्टेंबर २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तीगृहास भेट देऊन अधीक्षकांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला होता. २ डिसेंबर २०२४ रोजी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, बुलढाणा यांनाही निवेदन देण्यात आले होते, मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
वस्तीगृहाचा मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता नवीन बांधून डांबरीकरण करणे आणि हायमास्ट लाइट लावणे या प्रमुख मागण्या आहेत. २८ जून २०२५ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास, सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी दिला आहे.
या वेळी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यात वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते रामकृष्ण राजाने, ओबीसी नेते विजय पोहनकर, फुले-आंबेडकर विद्वत सभा समन्वयक दिलीप कोकाटे सर, रमेश नाईक, जगदीश हातेकर, श्रीकृष्ण गवई, प्रशांत अवसरमोल, उत्तमराव वानखेडे, प्रशांत नाईक, स्वप्नील गवई, युवराज वाघोदे, ॲड. विजय वानखडे, अक्षय वाकोडे, मयुर खंडेराव, रोशन तायडे, आदित्य तायडे, सुरज जाधव, मंगेश भारसाकळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.