नवी मुंबई – नवी मुंबईतील १७ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळेच्या इमारतीची अवस्था अवघ्या एका वर्षातच उघड झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अवघे चार दिवस झाले असताना गुरुवारी इयत्ता ६वी ‘क’ वर्गात शिकवणी सुरू असतानाच वर्गाच्या स्लॅबवरील प्लॅस्टरचे दोन मोठे तुकडे अचानक खाली कोसळले. या घटनेत वर्गात उपस्थित ३६ विद्यार्थ्यांना थोडक्यात जीव वाचला, तर संबंधित शिक्षिका देखील मरण्याच्या दारातून बचावल्या.
शाळेतील इमारत केवळ एका वर्षापूर्वीच वापरासाठी खुली करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच प्लॅस्टर गळणे, भिंतींना फाटोळ्या पडणे, छत गळणे यांसारख्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी घडलेली ही घटना शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “१७ कोटी रुपये खर्चून जर अशी इमारत उभी राहणार असेल, तर ती कुणाच्या जीवाशी खेळ करण्यासाठी आहे का?” असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नगरसेवक आणि पालक संघटना यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची दखल घेण्यात आली असून, प्राथमिक चौकशी सुरू आहे.
ही घटना केवळ भ्रष्टाचाराचीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर इशारा आहे. शैक्षणिक संस्थांची बांधकामे करताना निकृष्ट दर्जाचा वापर केल्यास त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात, हे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.