हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीप्रेरित सम्यक वि.आ.च्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाळांना भेट देण्यासाठी लेखी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.
तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा तसेच क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, या सुविधा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात योग्य पद्धतीने मिळत आहेत का, याची वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
यावेळी निवेदनकर्ते लकेश आवटे (जिल्हा उपाध्यक्ष, सम्यक वि.आं., हिंगोली), मोहम्मद असलम (युवा तालुकाध्यक्ष), युवा नेते राजू कांबळे, दिनेश पाईकराव (युवा तालुका महासचिव) तसेच कार्यकर्ते राजे रणवीर उपस्थित होते.





