परभणी: यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे मानवत तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भूमिहीन शेतमजूर, बलुतेदार, कारागीर, छोटे व्यावसायिक तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, मानवत तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी गायरान धारक शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी, खरीप पीक विम्याची रक्कम तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली.
गायरान जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प तात्काळ थांबवावेत आणि गायरान धारकांची सहमती घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प उभारू नये, अशीही मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावर चारा छावण्या सुरू कराव्यात, भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची परीक्षा व शालेय फी पूर्णपणे माफ करावी, तसेच मानवत नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शासनाने या मागण्यांवर तात्काळ निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड मोर्चा व धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते धम्मपाल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग पंडित, माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी राठोड, माजी तालुकाध्यक्ष दिगंबर घुगे, माजी तालुकाध्यक्ष दत्ता राऊत, युवक अध्यक्ष शरद कांबळे, तालुका सरचिटणीस जालिंदर वाघमारे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव धबडगे यांच्यासह विनोद मकासरे, दत्तराव तूपसमुंद्रे, संजीवनी लाटे, श्रीरंग लाटे, वत्सलाबाई कांबळे, रंजीत तुपसमुंद्रे, अनिरुद्ध कांबळे, भगवान सरोदे, गुंडीबा हरणे, सारीपूत खरात, कल्याण वैराळ, वैशिष्ट्य साळवे, लक्ष्मण सोनटक्के, शेषेराव गायकवाड, रतन लाटे, सुभाष कुंभकरण आदी उपस्थित होते.






