आंदोलनस्थळी रंगला रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा; मोठा भाऊ म्हणून प्रत्येक संघर्षात तुमच्या पाठीशी उभा राहीन — डॉ. नीरज वाघमारे
यवतमाळ : एका बाजूला आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष… दुसऱ्या बाजूला रक्षाबंधनाचा भावनिक सण… घरापासून आणि आपल्या भावांपासून दूर आंदोलनस्थळी ठिय्या मांडून बसलेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर त्या दिवशी संघर्षाची जिद्द होती; पण मनाच्या एका कोपऱ्यात आपल्या भावाला राखी बांधता न आल्याची हुरहूरही होती.
याच आंदोलनस्थळी रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र एक अत्यंत भावूक आणि अविस्मरणीय क्षण घडला. आंदोलक आदिवासी भगिनींनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांच्या मनगटावर राखी बांधली आणि आंदोलनाच्या मंडपातच एका नव्या भावा-बहिणीच्या नात्याची वीण गुंफली.
मागील पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रभर आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्क व अधिकारांसाठी तीव्र आंदोलन करीत आहेत. शासनासोबत वारंवार चर्चा होऊनही आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोकरभरतीसह प्रलंबित प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले घरदार सोडून आंदोलनस्थळी ठामपणे संघर्ष करीत आहेत.
रक्षाबंधनासारख्या बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण आला, तरी या विद्यार्थिनी आपल्या घरी परतल्या नाहीत. भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापेक्षा आपल्या समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाच्या मैदानात थांबणे त्यांनी निवडले. या त्यागाने आंदोलनस्थळी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.
यावेळी डॉ. नीरज वाघमारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या संघर्षाला पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थिनींशी बोलताना त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले— “आज तुम्ही आपल्या हक्कांसाठी घरापासून दूर आहात. आपल्या सख्ख्या भावाला राखी बांधण्यासाठीही घरी जाऊ शकलेल्या नाहीत. पण आजपासून स्वतःला एकटे समजू नका. मोठ्या भावाच्या भूमिकेतून, आयुष्यातील आणि या न्यायाच्या संघर्षातील प्रत्येक प्रसंगात एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.”
या शब्दांनी वातावरण क्षणभर भावूक झाले. त्यानंतर आंदोलक भगिनींनी मोठ्या उत्साहाने ‘नीरज भाऊंना’ राख्या बांधल्या, मिठाई भरवली आणि “आज आम्हाला आणखी एक भाऊ मिळाला” अशी भावना व्यक्त केली.
ज्या मंडपात काही क्षणांपूर्वी मागण्यांसाठी घोषणा आणि संघर्षाचा आवाज घुमत होता, त्याच मंडपात रक्षाबंधनाच्या निमित्ताने मायेचा, आपुलकीचा आणि बहीण-भावाच्या नात्याचा ओलावा पसरला. मनगटावर बांधलेला तो धागा केवळ राखीचा नव्हता; तो होता विश्वासाचा, आपुलकीचा आणि न्यायाच्या लढ्यात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या वचनाचा धागा.
घरापासून दूर असलेल्या आंदोलक भगिनींसाठी हा रक्षाबंधन सोहळा विशेष ठरला. आंदोलनाचा मंडपच काही काळासाठी त्यांचे माहेर बनला आणि संघर्षातील सहकारीच त्यांचे कुटुंब झाले. त्यामुळे हा रक्षाबंधन सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक व गटनेते डॉ. नीरज वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भानवे, शहर उपाध्यक्ष अरविंद दिवे, शहर उपाध्यक्ष उत्तम कांबळे, शहर महासचिव विलास वाघमारे, तसेच मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.





