मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. ही घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता यावर या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून कार्यवाही आणि राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे सोशल ऑडिट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी ई-मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना केली आहे.
९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यापैकी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केला. त्यापैकी दीपिका लाकडा, सुष्मिता मांडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. ही अत्यंत गंभीर घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे निवेदन देऊन जपतलाई दुर्घटनेची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच एका आश्रमशाळेची चौकशी करून प्रश्न संपणार नाही. जपतलाईच्या घटनेची चौकशी आवश्यक आहेच; मात्र राज्यातील हजारो विद्यार्थी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये राहत असल्याने संपूर्ण व्यवस्थेची तपासणी होणे गरजेचे आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे आणि छात्रालयांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी वंचितने केली आहे.
या सर्वेक्षणामध्ये इमारतींची सुरक्षितता, वीज व्यवस्था, स्वच्छता, साप-विंचू व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांची निवास क्षमता, खाटा व झोपण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आहार व पोषण, वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, आपत्कालीन उपचार व्यवस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, शैक्षणिक सुविधा तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा प्रत्यक्ष वापर यांची तपासणी करण्यात यावी.
हे सर्वेक्षण केवळ कागदोपत्री न करता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून करण्यात यावे. यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर प्रशासनाने केलेली कार्यवाही याचीही तपासणी करावी. त्याचा १५ दिवसांत अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांचे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
ज्या ठिकाणी गंभीर त्रुटी आढळतील, त्या तातडीने दूर कराव्यात. धोकादायक वसतिगृहांमध्ये आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्यायी निवास उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक आश्रमशाळेत सर्पदंश, आग, विद्युत अपघात आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसाठी २४ तास आपत्कालीन वैद्यकीय व प्रतिसाद व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
जपतलाई दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक मदत व पुनर्वसनाची व्यवस्था करावी. जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या आश्रमशाळांमध्ये त्यांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची हमी शासन देऊ शकत नसेल, तर सामाजिक न्यायाच्या घोषणा निरर्थक आहेत, असा आरोप राजेंद्र पातोडे यांनी केला. जपतलाई दुर्घटनेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
साप वसतिगृहात कसा शिरला, विद्यार्थिनी जमिनीवर का झोपत होत्या, सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली, निधीचा वापर कसा झाला आणि यापूर्वीच्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर आली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रयस्थ आणि निष्पक्ष यंत्रणेचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
तीन विद्यार्थिनींचा जीव गेला आहे. हा केवळ अपघात म्हणून विषय संपवता येणार नाही. दोषींवर कारवाई झाली नाही आणि राज्यातील आश्रमशाळांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण झाले नाही, तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने ‘जवाब दो’ आंदोलन उभारेल, असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.
तीन विद्यार्थिनींचा जीव गेला आहे; त्याला शासनाची निष्क्रियता आणि भ्रष्ट व्यवस्था जबाबदार आहे, असे आमचे ठाम मत आहे. आता सरकारने केवळ संवेदना व्यक्त न करता कृती करून दाखवावी, असेही पातोडे यांनी स्पष्ट केले.






