अमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडसह परिसरातील इतर गावांमध्ये संबंधित कंपनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता जुन्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरखेड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांची संमती न घेता आणि बंधनकारक नसताना स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसविणाऱ्या संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव सागर भवते यांनी इशारा दिला की, संबंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तक्रार दाखल करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते, ज्येष्ठ मार्गदर्शक भागवतराव इंगळे, नरेश खराते, प्रदीप खराते, सिद्दिक तसेच शिरखेड व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





