अकोला: अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच गंभीर आजार पसरण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
“हे गढूळ पाणी जर कोणी पिऊन दाखवलं, तर त्याचा गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो,” अशा अत्यंत उपरोधक आणि तिखट शब्दांत नगरसेवक पराग गवई यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
मागील सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाने अकोलेकरांना यापुढे गढूळ पाण्याचा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट हमी दिली होती. मात्र, प्रशासनाचे हे आश्वासन हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही नागरिकांच्या नळांना घाणेरडे आणि पिण्यास अयोग्य पाणी येत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा केला नाही, तर शहरातील सर्व संतप्त नागरिकांना थेट महानगरपालिकेच्या सभागृहात घेऊन येऊ,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी यावेळी दिला.






