Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

mosami kewat by mosami kewat
March 8, 2026
in article, अर्थ विषयक, विशेष, सामाजिक
0
कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

       

– संजीव चांदोरकर 

देशातील “बॉटम ऑफ पिरॅमिड” मधील कुटुंबांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. रिझर्व बँकेपासून अनेक संस्था त्याबद्दल आकडेवारी प्रसृत करून चिंता व्यक्त करत आहेत. आकडेवारी बाजूला ठेवली तरी वाढलेल्या कर्जबाजारीपणामुळे अनेकानेक कुटुंबे गंभीर मानसिक तणावातून जाऊ लागली आहेत. देशातील वाढत्या आत्महत्यांमध्ये अलीकडच्या काळात कर्ज वेळेवर फेडता न येणे एक प्रमुख कारण म्हणून पुढे येत आहे. 

एखाद्या कुटुंबाने काढलेल्या कर्जाचा हप्ता / ईएमआय ते कुटुंब सर्व सभासदांच्या एकत्रित मासिक उत्पन्नातून फारशी ओढाताण न करता भरू शकत असेल,  तर त्या कुटुंबाने काढलेले कर्ज वाजवी आहे असे म्हटले जाते. ज्यावेळी कर्जाचे हप्ते / ईएमआय भरण्यासाठी त्या कुटुंबाला आपले अत्यावश्यक खर्च देखील कमी करण्याची वेळ येत असेल,  तर ते कुटुंब “कर्जबाजारी” होत आहे असे म्हटले जाते. त्या पुढची पायरी असू शकते “कर्ज-सापळ्या”त अडकण्याची. ज्यावेळी डोक्यावरील आधीचे कर्ज फेडण्यासाठी कुटुंबाला नवीन कर्जे वारंवार काढावी लागतात, त्यावेळी ते कुटुंब “कर्ज-सापळ्या”त अडकले आहे असे म्हटले जाते. 

कर्जबाजारी झालेली सर्वच गरीब कुटुंबे अविचारीपणाने, कोणताही विचार न करता अव्वाच्यासव्वा कर्जे काढतात असे नाही. ही बाब मुद्दामहून नमूद करण्याची गरज आहे. कारण प्रस्थापित व्यवस्थेतील अनेक प्रवक्ते, अगदी मध्यमवर्गातील नागरिक सर्रास, गरिबांना चंगळवादाची चटक लागली आहे, ती पुरी करण्यासाठी ते मिळेल तेथून कर्जे घेऊ लागले आहेत अशी निर्भर्त्सना करतात. 

वस्तुस्थिती अधिक गुंतागुंतीची, आणि बऱ्याचवेळा गरिबांचे कोणतेही नियंत्रण नसलेली आहे. एखाद्या प्रातिनिधिक कुटुंबाचे आजचे मासिक उत्पन्न, त्यांनी काढलेल्या कर्जाचे हप्ते / ईएमआय भरण्यासाठी पुरेसे आहे अशी कल्पना करूया. पण एखाद्याला अचानक नोकरीवरून काढून टाकले जाते आणि त्याचा पगार बंद होतो; शेती किंवा अनुषंगिक कामातून जेवढे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते तेवढे उत्पन्न, निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा सरकारी धोरणातील बदलांमुळे, मिळत नाही किंवा चक्क तोटा होतो; कुटुंबातील सभासद छोटासा उद्योग / व्यवसाय करत असतील तर तो चालत नाही किंवा बंद पडतो …या सगळ्यामुळे ज्या आधारावर कर्ज काढले, त्या उत्पन्नाच्या आधाराला तडे जाऊ लागतात. कर्जाचे हप्ते / ईएमआय डोईजड होऊ लागतात. कुटुंबांचे अनेक खर्च असे असतात जे कुटुंबांना करावेच लागतात. महागाईमुळे ते खर्च कमी नाही तर वाढतच असतात. परिणामी कुटुंब कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटले जाते.

देशातील कोट्यावधी गरीब कुटुंबांच्या आयुष्यात वर उल्लेख केलेल्या सगळ्या विपरीत गोष्टी आज एकाचवेळी घडत आहेत. दुसऱ्या शब्दात गरीब कुटुंबांचा कर्जबाजारीपणा वाढण्यामध्ये,  गरिबांची उत्पन्ने पूर्वीपेक्षा कमी होणे त्यातील अनिश्चितता वाढणे, महागाई वाढणे ही प्रमुख कारणे आहेत. 

गरिबांच्या कर्जबाजारीपणाची कारणे कितीही समजण्यासारखी असली तरी गरीब कुटुंबांनी कर्जबाजारीपणाच्या या दुरावस्थेत न अडकण्यासाठी जे जे आवश्यक आहे तेथे सर्व करण्याची गरज आहे. कारण ते जीवघेणे प्रकरण आहे. 

कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी निर्धार 

कर्जबाजारीपणामुळे कुटुंबांच्या आयुष्यावर अनेक गंभीर परिणाम होतात. त्याची यादी मोठी आहे. उदा. कर्ज वसुली एजंटांच्या निर्दयी आणि अनेक वेळा अमानुष कारवायांना तोंड द्यावे लागते; गरिबांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते, गंभीर मानसिक तणावातून जावे लागते;  कर्जाचे हप्ते/ ईएमआय भरायचा आहे या विचाराने अनेक दिवस धड झोप लागत नाही, त्याचा परिणाम आरोग्यावर होतो, माणसे आजारी पडतात, त्यासाठी होणाऱ्या औषधोपचाराचा खर्च वाढतो, कामावर खाडे होतात, वेतन बुडते, धंद्यावर लक्ष लागत नाही, उत्पन्न बुडते; हे प्रकरण आत्महत्येपर्यंत जाऊ शकते. हप्त्यासाठी लागणारी रक्कम बाजूला काढण्यासाठी, कुटुंबाच्या अत्यावश्यक खर्चात, सकस आहारात कपात करावी लागते, त्याचा परिणाम कुटुंबातील वाढत्या वयाच्या मुलामुलींवर होतो. कुटुंबातील सभासदांमध्ये भावनिक ताणतणाव सुरू होतात. क्षुल्लक कारणांवरून भांडणे होऊ लागतात…. इत्यादी. 

कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची वारंवार उजळणी करण्याची गरज आहे. यासाठी की त्यातून कसेही करून तशी परिस्थिती न येण्यासाठी लागणारे आत्मबळ तयार होईल. काय करता येईल याची चाचपणी कुटुंबे करू लागतील. मान्य आहे, की याला सरळसोट उत्तरे नाहीत. पण मनात निर्धार तयार होणे अत्यावश्यक आहे. तरच ही कोंडी काही प्रमाणात तरी फुटू शकते. 

या प्रक्रियेत गरीब कुटुंबातील महिला खूप मोठी भूमिका निभावू शकतात. अनेक कारणे आहेत. या कुटुंबातील महिला कुटुंबामध्ये येणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन बघत असतात. आज नाही तर पिढ्यानपिढ्या.

कुटुंबातील सभासदांच्या, विशेषतः पोटच्या मुला मुलींच्या भल्याची, भवितव्याची काळजी घरातील पुरुषांपेक्षा महिलांना काही पटींनी जास्त असते. 

वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येऊ शकेल. कुटुंबाने कर्जबाजारी होणे किंवा न होणे याला दोन गोष्टी प्रभावीत करत असतात. एक, उत्पन्नाची पातळी आणि दोन, खर्चाची पातळी. अनेक कारणांमुळे, उत्पन्नाची पातळी टिकवणे किंवा वाढवणे हे कुटुंबातील सभासदांनी दिवसाचे बारा बारा तास कष्ट जरी उपसले तरी त्यांच्या हातात नसते. त्याच्यावर त्यांचा कंट्रोल नसतो. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट कुटुंबाच्या म्हणजे महिलांच्या हातात नक्कीच असते: कशावर आणि किती खर्च करायचा. 

 कुटुंबांच्या खर्चाचे तीन प्रकार 

कुटुंबांना जे खर्च करावे लागतात त्याचे ढोबळमानाने तीन भाग करता येतील. 

पहिला प्रकार: अत्यावश्यक खर्चाचा. 

अत्यावश्यक खर्च म्हणजे आज, आत्ताच करावा लागणारा. तो नाही केला तर वेगळ्या अधिक गंभीर प्रश्नाला सामोरे जायला लागणार असते. उदा. खाण्यापिण्यावरचा खर्च, घरभाडे, वीजबिल, सार्वजनिक वाहतूक, मुलांची शिक्षणे, अचानक उद्भवलेले आजार इत्यादी. घरभाडे भरले नाही तर घर सोडावे लागणार असते. मुलांच्या फिया वेळेवर भरल्या नाहीत तर त्यांचे शिक्षणात खंड पडू शकतो. अचानक उद्भवलेल्या आजारावर उपचार केले नाहीत तर अगदी माणूस दगावू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कुणाकडून तरी हात उचल घेणे, नाहीच मिळाली तर कर्ज काढणे समर्थनीय ठरते. 

दुसरा प्रकार: आवश्यक, पण तातडी नसणारे खर्च 

हे खर्च आवश्यक असतात. पण पहिल्या प्रकारासारखी त्यामध्ये तातडी नसते. ते कालांतराने केले तरी काही जीवन म्हणूनच गंभीर परिस्थिती उद्भवणार नसते. उदा. स्मार्ट फोन स्वतःसाठी किंवा तरुण मुलगा/ मुलीसाठी खरेदी करावासा वाटणे. आजकाल तर आवश्यक झाला आहे. पण १५,००० रुपयांचे मॉडेल घ्यायचे का ३०,००० रुपयांचे हे ठरवणे आपल्या हातात असते. नेहमी कमी किमतीचा स्मार्ट फोन वापरावा असे थोडेच आहे. शिस्तबद्ध पद्धतीने पैसे साठवावेत, दोन वर्षांनी ४०,००० रुपयांचा देखील घ्यावा. कुटुंबातील एखादा सभासद आजारी पडला तर त्याच्यावर मी एवढेच पैसे खर्च करीन असे ठरवायला जागाच नसते. 

स्मार्ट फोन एक उदाहरण झाले. तीच गोष्ट घरातील समारंभाबाबत. वाढदिवस साजरा करणे, लग्न हे खूप महत्वाचे कौटुंबिक समारंभ असतात. पण त्यावर किती पैसे खर्च करायचे हे आपण नकीच ठरवू शकतो. 

तिसरा प्रकार:टाळता येण्याजोगा 

या प्रकारातील खर्च म्हणजे अनेक शतकांच्या रुढी / परंपरांनी लाखो कुटुंबांच्या डोक्यावर लादलेली ओझी आहेत. घरातील लहान मुलाच्या जन्मापासून ते कुटुंबातील एखादा सभासद मृत्यू पावण्यापर्यंत संपूर्ण जीवनचक्रामध्ये अनेक रूढी / परंपरा पाळल्या जातात. त्यात रुढी / परंपरांबद्दल आदर बाळगणे, त्या पाळणे एक भाग झाला. पण त्याच रुढी/ परंपरा कमी पैसे खर्च करून देखील पाळता येतात. त्या रूढी परंपरा पाळताना माणसे कर्जबाजारी होत असतील तर ? प्रत्येक धर्म त्या धर्माचे पालन करणाऱ्याचे कल्याण करण्यासाठी आहे असे सांगितले जाते; तर मग तसे पालन करताना कर्जबाजारी होऊन एखाद्याचे अकल्याण होत असेल तर ? यात अलीकडच्या काळात भर पडली आहे ते नवीन बाबा / गुरु यांनी सांगितलेल्या व्रत आणि कर्मकांडाची. 

वर मांडलेला विचार काही नवीन नाही. लोकांना या जोखडातून मुक्त करण्यासाठी, सण/ समारंभ न झेपणारी कर्जे काढून साजरे करू नका हे सांगण्यासाठी आपल्या देशात अनेक संत, महात्मे, विचारवंत यांनी आयुष्य झिजविले आहे. हे तिसऱ्या प्रकारचे खर्च करून कर्जबाजारी होण्यात कोणतेही शहाणपण नाही. यातील अनेक खर्च “ नातेवाईक, गाववाले, आजूबाजूचे लोक” काय म्हणतील अशा दडपणातून केले जातात. ही आजूबाजूची माणसे दोन दिवस बोलतील आणि विसरून जातील. पण काढलेल्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी एक रुपयाची मदत करणार नाही. खरेतर उलटा परिणाम होऊ शकतो. एखाद्याने धैर्याने रुढी/ परंपरा मधील खर्चिक कर्मकांड वगळून साजऱ्या केल्या तर इतरांना त्यातून धैर्य येऊ शकते. कारण ते देखील त्याच दुष्टचक्राचे बळी असतात. 

कर्ज काढणे, किती काढणे पूर्णपणे आपल्या हातात 

एकदा का वर चर्चा केल्याप्रमाणे कुटुंबाच्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवले तर कर्ज नक्की कशासाठी आणि किती कर्ज काढायचे याची स्पष्टता येऊ लागेल. लक्षात घ्या आपण गरिबांनी कर्ज काढूच नये असे म्हणत नाही आहोत. कधीच म्हणणार नाही आहोत. खरेतर एखादी चीजवस्तू घेण्याची ठरल्यानंतर त्यासाठी काटकसर करून किमान काही पैसे साठवता येतात. २०,००० रुपयांचा मोबाईल घ्यायचा आहे तर काही महिने १०,००० रुपये बचती साठवून लागणाऱ्या १०,००० रुपयांचे कर्ज काढता येते. त्यामुळे ईएमआय अर्ध्यावर येतो. 

ज्यावेळी आजच्यासारखी कर्जे सहजपणे उपलब्ध नव्हती अशा काळात कुटुंबे चीजवस्तूंची खरेदी, घरातील कार्ये अशाच योजनाबद्ध पद्धतीने करतच होती. आपल्या कुवतीत राहून खर्च करत होती. कारण दाम दुपटीने व्याज लावणाऱ्या खाजगी सावकारांशिवाय दुसरे कोणी कर्ज देणारे अस्तित्वातच नव्हते 

आयुष्य खूप एन्जॉय करून नक्कीच जगले पाहिजे. आनंद देणाऱ्या, कुटुंबीय, आजूबाजूचे लोक यांना एकत्र आणणाऱ्या रुढी परंपरा डोळसपणे पाळल्या पाहिजेत. प्रश्न तयार होतो ज्यावेळी आपण जास्त व्याज असणारे कर्ज काढून ते सर्व मिळवू पाहतो. कर्ज काढून आता छोट्या काळासाठी एंजॉय करायचे आणि नंतर अनेक महिने, वर्ष हप्ते न फेडता आल्यामुळे पोखरणाऱ्या चिंतेमुळे आयुष्य एंजॉय करणे विसरायचे…. यामध्ये कोणते पारडे जड होणार ? याचे उत्तर उघड आहे. 

नोकऱ्या मिळत नाहीत, नोकरीवरून काढले जाते, वेतन कमी मिळते, ठरलेले वेतन मिळत नाही, निसर्ग लहरी झाला आहे, शासन हमी भाव देत नाही, महागाई सतत वाढतेय, टाकलेला धंदा चालत नाही, कंबर तुटेपर्यंत कष्ट केले तरी परिस्थिती सुधारत नाही, दाराशी येऊन कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था कर्ज घेण्यास उद्युक्त करतात, अव्वाच्या सव्वा व्याज लावतात…. कर्जबाजारीपणाला हे सर्व कारणीभूत आहे. पण यावर आपला काही आजतरी कंट्रोल नाही. 

मग प्रश्न असा विचारवायास हवा की “माझा कशावर कंट्रोल आहे ?”. ज्याच्यावर आपला कंट्रोल आहे अशा गोष्टींची यादी करून त्यावर निर्धाराने काम केले पाहिजे. आणि हे काम प्रत्येक कुटुंबातील महिला नक्कीच करू शकते. त्यांना भले शिकण्याची संधी नाकारली गेली असेल, त्यांना भले बँकिंग आणि मायक्रो फायनान्स मधील शास्त्रीय ज्ञान नसेल …पण घर, संसार कसा चालवायचा याचे त्यांच्या आया, आज्या आणि आजुबाजूच्या स्त्रियांकडून आलेले परंपरागत शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच आहे. त्यांनी फक्त निर्धार करण्याचा अवकाश. आज त्यांना भेडसावणाऱ्या कर्जबाजारीपणाच्या प्रश्नाची धार त्या नक्कीच बोथट करू शकतात. 


       
Tags: BottomOfPyramidDebtTrapEconomicInequalityFinancialAwarenessFinancialStressHouseholdDebtIndianEconomyLoanBurdenPovertyInIndiaPovertyIssuesResponsibleSpendingRisingDebtSocialJusticeWomenAndFinance
Previous Post

महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद
बातमी

इराण–इस्रायल संघर्षाची झळ भारतात; एलपीजी वापरावर प्राधान्य, काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

by mosami kewat
March 9, 2026
0

पुणे: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलमधील तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. गेल्या शनिवारी इराणमधील मोठ्या तेल...

Read moreDetails
विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा

विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा

March 8, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल

March 8, 2026
कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

March 8, 2026
महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन

महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन

March 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home