नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कचरा संकलनात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
भारत सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार, घराघरातून दररोज कचरा संकलन करणे नगर पंचायतीवर कायदेशीर बंधनकारक आहे. मात्र, बहादुरा नगर पंचायत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘कागदावर स्वच्छता आणि जमिनीवर घाण’ अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. ( Nagpur news)
दररोज कचरा उचलला जात नसतानाही जर कंत्राटदाराला पूर्ण देयके अदा केली जात असतील, तर हा थेट भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि बेजबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यश कुंभारे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, हा केवळ स्वच्छतेचा विषय नसून नागरिकांच्या मूलभूत आरोग्य अधिकारांचा प्रश्न आहे. जर प्रशासनाने तात्काळ दररोज कचरा संकलन सुरू केले नाही, तर नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. ( Nagpur news)
यावेळी बहादुरा शहर अध्यक्ष कुणाल सुखदेवे, महासचिव प्रफुल माटे, संघटक छत्रपाल तामगाडगे, उपाध्यक्ष समीर वानखेडे, राकेश पाटील, प्रफुल पवार, अजय ठाकरे, हरेंद्र जांगळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





