रायगड : जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या इशाऱ्यामुळे रायगड प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज, १५ जुलै रोजी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
नेमकी काय आहे परिस्थिती?
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, समुद्राला आलेल्या भरतीमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुट्टीचा निर्णय घेतला आहे.
‘या’ तालुक्यांमध्ये शैक्षणिक संस्था बंद राहणार:
आज खालील सहा तालुक्यांमधील अंगणवाड्या, सर्व सरकारी आणि खासगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा आणि सर्व महाविद्यालये बंद राहतील:
१) माणगाव
२) तळा
३) रोहा
४) पाली
५) महाड
६) पोलादपूर
शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना:
ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना लागू आहे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मात्र आपल्या शाळेत किंवा कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी त्यांनी सज्ज राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.