– आकाश मनिषा संतराम
संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण तरुणींमध्ये या दिवसाचे महत्त्व अधिक आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. एवढंच काय तर संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या सोबत राहण्याचा आणभाका आजच्या दिवशी तरुणाई घेत असते. हा व्हॅलेंटाइन डे कसा सुरू झाला, याबाबत अनेक कहाण्या आहेत. एका दंतकथे नुसार संत व्हॅलेन्टाईनचा हा बलिदान दिवस आहे. परंतु युरोप मध्ये अजूनही संदिग्धता आहे की, नक्की कोणत्या व्हॅलेन्टाईन नावाच्या व्यक्तिपासून सुरुवात झाली. नंतरच्या काळात, जगातील अनेक ठिकाणी प्रणय आणि प्रेमाचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक उत्सव बनला. पण सध्याच्या काळात प्रेमाचा अर्थ बदलू लागला आहे. नात्यांमधील विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे. हे तरुण तरुणींच्या मध्ये मोठ्या प्रमाणात दिसते.
पण भारताच्या इतिहासात प्रेमाचा खरा अर्थ सांगणाऱ्या काही ऐतिहासिक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे फुले दांपत्य म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले, दुसऱ्या जोडीचा उल्लेख करायचा झाला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर. आता या दोन्ही जोडप्यांनी भारतात समतावादी समाज निर्माण करण्याचं काम केलं आहे. दीन – दुबळ्या समाजाला आत्मविश्वास देण्याचे काम केलं. हे काम करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांना माता सावित्रीबाई फुले यांनी मोलाची साथ दिली. खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचे काम असो किंवा अस्पृश्यता निवारण करण्याचे काम असो या दोन्ही कार्यात माता सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा, कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांना साथ दिली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, समाजकार्यासाठी आणि राजकीय कार्यासाठी माता रमाबाई आंबेडकरांनी मोलाची साथ दिली. अहो, एवढंच काय तर पोटच्या चार लेकरांचा मृत्यू झाला तरी बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा येऊ नये याची काळजी माता रमाबाई आंबेडकर यांनी घेतली. सारं सारं दुःख पचवलं पण पतीला साथ दिली. असही म्हटले जाते की, रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांच्या आयुष्यात नसत्या तर, भिवा पासून डॉ.भीमराव आंबेडकर कधीच झाले नसते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले असताना माता रमाबाई आंबेडकरांनी शेणाच्या गोवऱ्या थापून अठराविश्व दारिद्र्याचा रथ ओढण्याचे काम केले. हे करत असताना परदेशात असणाऱ्या बाबासाहेबांना याबाबत काहीच सांगितलं नाही. पण याबाबत बाबासाहेब ज्ञात होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटल की, समोर उभे राहते एक प्रतिमा. कडक शिस्तीचे, समाज आणि देशाचा विचार करणारे बाबासाहेब सर्वांना माहिती आहेत. पण खाजगी आयुष्यात भावनिक आणि प्रेमळ असणारे बाबासाहेब हे मोजक्या लोकांनाच माहिती. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी होते. त्यावेळी ते भारतात पत्रव्यवहार करत असत आणि इथल्या परिस्थितीच्या बाबतीत जाणून घेत असत. माता रमाबाई आंबेडकरांना सुद्धा बाबासाहेबांनी पत्रे लिहिली. या पत्रावरूनच खऱ्या प्रेमाची व्याख्या आपल्याला समजून येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माता रमाईंना पत्र –
प्रिय रमा,
रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर..?
कशी आहेस रमा तू? तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण येत आहे. तुमच्या आठवणीने माझे मन खूपच हळवे झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्याबद्दल इकडच्या वर्तमानपत्रात लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा मी विचार करत होतो, आणि माझ्या डोळ्यासमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.
दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षांपासून गाडली गेली आहेत. या गाडले-पणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होत आहे रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आले आहेत. खूपच हळवी झाली आहे मन. खूप व्याकुळही झाले आहे. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली आणि यशवंताची सुद्धा. मला आठवतं तू मला बोटीवर पोहचवायला आली होती.
मी नको म्हणत होतो तरीही तुझे मन राहवले नाही. तेव्हा मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तेव्हा ते चित्र तू पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेने तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नव्हतं ते सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.
तुझ्या गळ्यातील का आवंढा ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातल्या शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी माझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे इंग्लंडमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे.
कशी आहेस रमा तू? माझा यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो का तो? त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा, आपली चारही मुले आपल्याला सोडून गेली. आता आहे आपला फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. त्याला खूप अभ्यासही करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवत जा.
माझे बाबाही मला रात्री अभ्यासासाठी उठवीत असायचे. तोवर ते जागे राहत असत. ती शिस्त त्यांनीच लावली. मी उठलो मी अभ्यास सुरू केला की मग ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई, त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला याचे सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना जाते. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहिले.
मी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळ आली. फार फार आनंद वाटतोय रमा आज. रमा यशवंतच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव – सुबत्ता ही सर्व निरर्थक आहे.
तू अवतीभोवती पाहते आहेसच ना माणसे अशाच गोष्टींच्या मागे लागलेली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्य जागा बदलत नाहीत, आपल्याला असे जगून चालणार नाही. आपल्याजवळ दुःखात शिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय गरिबी दुःख याच्याशिवाय आपल्याला कसलीही सोबत नाहीअडचणी संकटे आपल्याला सोडत नाहीत. अपमान छळ अहवेलना ह्या गोष्टी आपल्याला सावली सारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाची समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे. आपणच आपला मार्ग झाला पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावरचा जिद्दीचा प्रवास देखील आपलाच झाला पाहिजे.
आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत म्हणून म्हणतोय रमा यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची आणि त्याची काळजी घे. त्याच्यात जिद्द जागव.
मला काहीच कळत नाही असेही नाही रमा , मला कळतंय कि, रमा या दुःखाच्या वनव्यात तू स्वतः करपून जात आहेस. पाने गळून जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा, वसा ज्ञानाचा! विज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचेही भान नाही. पण ही शक्ती मिळवण्यात तुझा ही महत्वाचा वाटा आहे.
तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे. खरं सांगू रमा मी निर्दयी नाही, जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी सादही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो.
मलाही हृदय आहे रमा. मी कळवळतो परंतु मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी! म्हणून मला स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुलाही आणि यशवंतलाही कितीतरी झळा बसतात हेही तितकेच खरे आहे. हे लिहिताना रमा मी उजव्या हाताने लिहीत आहे आणि डाव्या हाताने माझी अनावर झालेली आसवे पुसत आहे. त्याला सांभाळ रमा त्याला मारू नको, मी कधी त्याला मारले होते याची आठवणीही त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घटक आहे.
माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा आर्थिक आणि सामाजिक उचनीचतेच्या गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे त्याला पार जाळून पुसून टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे.
रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर ? तु मला साथी म्हणून मिळाली नसती तर? तर काय झालं असतं?
केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गौऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामाला जाणे हे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत हे कोण पसंत करेल? घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच काड्याची पेटीमध्ये महिना निघाला पाहिजे, एवढेचधान्य एवढेच ते लिमिट महिनाभर पुरले पाहिजे.
हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले आदेश हे तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती. आणि तिला त्या त्या वेळी लगेच आहोटी ही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. जीवनाचा सर्व सूर बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करू नको सर्वात भूषण सांग.
कळावे,
तुझाच भीमराव!
हे पत्र वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या आणि माता रमाईंच्या नात्यातील बंध, प्रेम दिसून येते.आजच्या काळात असा समजूतदारपणा, बंध आणि प्रेम कुठेच पाहायला दिसत नाही. बाबासाहेबांच्यासाठी काबाड कष्ट करणारी, बॅरिस्टरची पत्नी असताना आपल्या पतीच्या स्वप्नांसाठी राबणारी रमाई आणि इथल्या कोट्यावधी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे बाबासाहेब यांच्या नात्यातील गोडवा आणि यांचे प्रेम शब्दांत मावणारे नाही हे ही तितकंच खरं.