मुंबई – राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आक्टोंबर नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नुकतेच राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूकांसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निवडणूक प्रभाग रचना, मतदार याद्या अद्यावत करणे आणि इतर निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसाठी महापालिकांना साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका या आक्टोंबर नंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.
नुकतेच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्णय घेतला आहे. त्यानूसार महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना करण्यात येणार आहेत. राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 महिन्यांच्या कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत. ज्यातील नगरपरिषद आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया 7 टप्प्यांमध्ये राबवली जाते. या प्रक्रियेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतर आक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.