मुंंबई : सिनेअभिनेता डिनो मोरियासह एकूण 8 जणांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यामुळे मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी आता मोरियासह 8 जणांचे पाय खोलात आहेत. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे. डिनो मोरियासह आठ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
या प्रकरणात ईडीने एकाच वेळी मुंबई, कोची आणि त्रिशूर येथील १८ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये रोकड, बँक खाती, डिमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तर या प्रकरणी पालिकेच्या 3 अधिकार्यांसह 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ व 2 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार तपासाला वेग आला आहे. ईडीने महाराष्ट्रातील मुंबई तर केरळमधील कोची व त्रिशूर या ठिकाणी पाळंमुळं खोदण्यासाठी छापेमारी केली आहे.
मिठी नदी घोटाळा नक्की काय आहे?
मिठी नदीची साफसफाई व गाळ काढण्यासाठी सन 2021–22 आणि सन 2022–23 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने जवळपास 65 कोटी रुपये खर्च केले होते. मुंबईला महापूराचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता. पण पुढे तपासात असे आले की, प्रत्यक्षात कोणतीही नाले, नदी सफाई करण्यात आली नाही. या सफाईसाठी बिल मिळवण्यासाठी बनावट अहवाल सादर करण्यात आले. ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आली. या सर्व प्रकरणात 65 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे.