गुरूवारी, १२ जून २०२५ रोजी दुपारी एअर इंडीयाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. अहमदाबाद ते लंडन विमानाला अहमदाबाद शहरातच हा अपघात झाला. त्यात २७५ पेक्षा जास्त प्रवाशांचा होरपळून कोळसा झाला. यात लहान लेकरांपासून वयस्कर माणसांपर्यंतचा समावेश आहे. या विमानातील वैमानिकांसह एअर होस्टेजेस सा-यांचाही समावेश आहे.
तोच नवी ब्रेकींग न्यूज येते आणि गिधाडासारखी मीडिया त्यावर झडप घालते! इंद्रायणीवरील पूल पडला! आणि विमान अपघात-सारा मृत विषय मागे सरतो! या ब्राह्मणी, भांडवलशाही युक्त व्यवस्थेने सारी संवेदनशीलताच मारून टाकलीय. मात्र बहुतांश मोदी-शहा-अडाणी-अंबानी प्रेमी वृत्तपत्रे. टि.व्ही. चॅनल्स, आजी-माजी सत्ताधा-यांनी कुणीच अडाणी समूह आणि विमानतळ क्षेत्र संबंधांविषयी उल्लेख करायचे टाळलेले दिसत आहे.
त्याचबरोबर या विमान अपघातासंबंधाने काही महिन्यात अहवाल येवू शकतात! शकतात म्हणण्याचे कारण, यात सताधा-यांच्या संबंधाने काही अहवालात इशारे करू लागले तर मात्र, ते कधीच बाहेर येतील याची शक्यता कमी आहे. त्यातच लोकांच्या स्मृतीही तात्पुरत्या असतात. हे त्यांनी चांगलेच जाणले आहे! या मृत्यू पावलेल्या प्रवाशांत बरेचसे प्रवाशी इतर राष्ट्रांतील होते. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय स्तरावरून जर आवाज उठू लागले; तर मात्र काहीतरी अहवाल बाहेर आणावा लागेल. आतातरी अपघाताची विविध कारणे समोर येत आहेत.
ड्रिमलाइनर ७८७-८ या विमानाच्या निर्मिती कंपनी विषयी आंतर्राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. यातील वैशिष्ट्यांपासून ते त्रुटींपर्यत परत चर्चा सुरू झाली आहे. आपल्या इथले काही हुशार पत्रकार व्हीडीओ पाहून काही निरीक्षणंही नोंदवू लागले आहेत. राष्ट्रीय-आंतर्राष्ट्रीय स्तरावर विविध कंपन्यात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. तशी येथे टाटा कंपनी आणि अंबानी-अडाणीबरोबरही काहीसी उघड व भूमिगत स्पर्धाही सुरू आहे. एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी ‘टाटा एअरलाइन्स’ म्हणून केली होती.
पुढे कॉंग्रेस सरकारच्या राष्ट्रीयकरणाच्या धोरणानुसार १९५३ मध्ये, भारत सरकारने एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण केले आणि ती सरकारी मालकीची कंपनी बनली. परंतु,नंतर कॉंग्रेस सरकारच्याच नवीन आर्थिक खाजगीकरणाच्या धोरणानुसार २०२१ मध्ये, टाटा समूहांनी एअर इंडियाची मालकी पुन्हा स्वत:कडे घेतली.
दरम्यान, याच धोरणानुसार मोदी-शहा सरकारचे लाडक्या अदानी समूहाने २०१९ मध्ये विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला आणि या समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) मध्ये कार्यरत असलेल्या अदानी विमानतळांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे अहमदाबादसह लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांचे आधुनिकीकरण आणि संचालन करण्याचे काम मिळाले.
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (SVPI) हे मध्य अहमदाबादच्या उत्तरेस ९ कि.मी. अंतरावर हंसोल येथे स्थित आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान सदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले आहे. अदानी कंपनी ५० वर्षांसाठी सर्व सहा विमानतळांचे संचालन, व्यवस्थापन आणि विकास करेल आणि ते श्रीमंत लोकसंख्येला – उच्च दरडोई उत्पन्नाला सेवा देते. भारतातील आणि परदेशातील अनेक शहरांना जोडते. विमानतळावर सध्या ४ टर्मिनल आहेत.
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, दुय्यम वाहतुकीसाठी एक अतिरिक्त टर्मिनल आणि एक कार्गो टर्मिनल. विमानतळावर ४५ पार्किंग बे आहेत आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही टर्मिनलवर प्रत्येकी चार एरो-ब्रिज आहेत. विमानतळावर ३,५०५ मीटर (११,४९९ फूट) लांबीची एकच धावपट्टी आहे. रविवारी, १६ जून रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळलाय, ही बातमी! या दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले.
या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला; तर ५२ जणांना वाचवण्यात यश आले. ५१ जण जखमी झाले आहेत. यावेळी त्या पूलावरती मोठ्या प्रमाणावर लोक असल्याचे सांगण्यात येते. अनेक लोक एकाचवेळी या पुलावरती आल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस. कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटून कोसळला, आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. १९९३ साली हा पूल तयार झाला, तेव्हापासून वापरात होता.
मात्र २०२३ साली म्हणजे ३० वर्षानंतर हा पूल जीर्ण दिसून आलं होतं. आणि दीड वर्षांपासून पूल वापरास बंद करण्यात आला होता. मग सवाल उभा राहातो, पर्यटक पुलावर कसे काय आले? पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन ते रविवारी कुठं होते? अशीच घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. महाडमधील इंग्रजांच्या काळातील सावित्री नदीवरी पूल तर रात्री कोसळून खुप मोठी मनुष्य हानी झाली होती. एस.टी. सह काही गाड्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यावेळीही हा जुना पूल वाहतुकीला धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते.
पण त्याचे पुढे काय झाले? सारी चिडीचूप! मागील काही वर्षांत अशाच रेल्वे, विमान, रस्ते, पूल, वन विभाग, महापूर, हॉस्पिटल्स, उंच इमारती, दाट वस्तितील जुन्या इमारती, नदीत घरे-बंगले बांधणे, शहरातील नैसर्गिक नाले बुजवून वा त्यावर भल्या मोठ्या इमारती बांधणे, चार वर्षांत करावयाचे काम दहा-दहा वर्षे न करणे आणि नंतर कितीतरी पटीत बजेट वाढवून मंजूर करून घेणे, रस्त्यावरच्या खड्ड्यांची कहाणी तर सुरस, चमत्कारीकच आहेत! तेच नाले सफाईबाबत. दरवर्षी पाऊस सुरू झाला. नाल्यातून पावसाच्या पाण्याबरोबर वरचा सर्व काडी कचरा वाहून जातो.
मग मुंबई वा औरंगाबादच्या महानगरपालिकांची वा कंत्राटदारांची प्रचंड, मोठी यंत्रे काहितरी थातूर मातूर काम करताना दिसतात. परत पाऊस आला की, सारे येरे माझ्या मागल्या. कचरा प्रश्न तसाच रेंगाळत पडलाय! मात्र वरच्या सा-या कामांचे १००% पैसे आधीच उचललेले असतात. येथे जेवढे प्रशासन, कंत्राटदार, जबाबदार असतात, तेवढे किंबहुना अधिकच तेथील सारे लोकप्रतिनिधी आणि सरकार जबबाबदार आहेत. सारेच्या सारे राजकीय-आर्थिक हितसंबंधांनी अंघोळी करत असतात. तेथे संघ-भाजपचे ईडी कार्यालय, मोदी-शहा हस्तक्षेप करूच शकत नाहीत.
विमान कंपन्या, टाटा-अंबानी-अडाणी सारे सरकारच्या देखरेखी व धोरणानुसारच काम करतात ना? पण लाडक्या अंबानी-अडाणींना कोण हात लावणार? सारे बेहिशोबी पिएम. फंडाचे वाटेकरी! मग अहमदाबादच्या अडाणी विमानतळावरच्या घटनेबाबतही तसेच घडलेले आहे. आधी टाटाने तात्काळ प्रत्येक मृत व्यक्तिमागे एक कोटी मदत जाहीर केली. मग २५ लाख आणखी मदत देणार असल्याचे जाहीर केले. जखमींचा सर्व खर्च करणार. ही सारी आश्वासनं १००% पूर्ण होतील यात शंका नाही. टाटा सामाजिक-शैक्षणिक-संशोधन-आरोग्य क्षेत्रांत कितीही मोठे काम करो, ते प्रामाणिकपणे करतही आहे.
आता अपघातानंतर काही तासातच टाटाने एवढी मोठी वाटणारी मदत जाहीर केली. तिही तात्काळ. मागे कोणताही उदारपणा व दयाबुध्दी नाही. तर त्याला आंतर्राष्ट्रीय कायद्यानुसार बंधनेही आहेत. सरकार चौकशा करत बसेल आणि वेळ मारून नेईल! या विमान अपघातात तेथील मेडिकल वसतिगृहही सापडते आणि कितीतरी जणांच्या स्वप्नांचे चुराडे होतात. विमान अपघातात होरपळून जळलेल्या प्रेतांना त्यांचे नातेवाईक हातगाडीवरून खुल्या रस्त्यातून धावत धावत नेतानाचे फोटो आले आहेत. तो मानवी-कोळसा झाकायला कपडाही विश्वगुरू म्हणवणा-या मोदींच्या गुजरातमध्ये नाही.
आणि पाठ्यपुस्तकातून वाचलेय, आताही पाहतोय अहमदाबादला कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातूनही अनेकजण येथे लग्नाचे बस्ते, व्यवसाय करायला येथे येत आहेत. तिथे दोन-चार मिटर कपडा या कामाला मिळाला नाही. तीस वर्षांपासूनचे संघ-भाजपचे निर्लज्ज सरकार आहे. या अपघाताची जबाबदारी स्वीकारून मोदी, शहा व गुजरात सरकारने पाय उतार व्हायला हवे. पण एवढीही नैतिकता संघिष्ठांकडे नाही हेच खरे आहे. टाटांनीही आपल्या ऐतिहासिक कामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर यायला हवे.
मात्र, यात दोन बाबी सुखरूप असल्याचे जाणवते. आणि चमचा मीडियाने कागदावर छापलेली भगवतगीता आणि ब्लॅक बॉक्सचे कौतुक सुरू केलेय. प्रचंड तापमानात ब्लॅक बॉक्स आणि भगवतगीता सुखरूप, एकाचवेळी दोन्ही इंजिन्स बिघडणे, हे सारेच संशयास्पद आहे. यात खरे कौतुक हवे, “मे डे” चा गांभीर्याचा संदेश देवून विमान चालकाने तुलनेने कमी मनुष्यवस्तीत विमान पडेल, असे पाहिले.
आणि स्वत:सह उदध्वस्त झाला! विनम्र अभिवादन सा-यांना! पंतप्रधान मोदी, शहा करताहेत निवडणुकांची तयारी. परदेश दौरे कताहेत, कधीही न बनू शकणा-या विश्वगुरूची! यातही काळजी आहे त्यांना लाडक्या अडाणीची! त्याला या विमान अपघातातून मोकळे करण्याची! आताच अहमदाबाद पाठोपाठ एअर इंडियाच्या हॉंगकॉंग ते दिल्ली-मुंबई विमानात काहीतरी घोळ झाल्याचे लक्षात आले. आणि ते विमान तात्काळ खाली उतरावे लागले असल्याची बातमी आली आहे.
आमच्या औरंगाबादच्या नवे बांधकाम चालू असलेल्या सिध्दार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील सिमेंटचा भाग कोसळला. आणि दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाला आहे. या अत्यंत संतापजनक आणखी एका बातमीवर वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “हा अपघात नाही. ही तर हत्या आहे. याचे मारेकरी प्रशासन आहे.” मात्र शासन-प्रशासनाच्या बेजबाबदार-निर्लज्जतेच्या कठड्यावर बसून मजा मारतेय असे वाटते. यावर एवढेच म्हणेन,”जसे असंवेदनशील, क्रूर, निर्लज्ज राज्यकर्ते, तसाच व्यवहार बाहेर दिसतो.”
– शांताराम पंदेरे मोबा. : ९४२१६६१८५७
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप
बीड : राज्यातील गोरगरिबांना स्वस्त दरात पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर पुन्हा एकदा भ्रष्टाचार...
Read moreDetails