नाशिक : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, गल्लीत, पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामे करावीत, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. १२ जून रोजी नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकारी गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विचारमंचावर मेळाव्याचे अध्यक्ष नाशिक महानगरप्रमुख अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख, अरुण जाधव, चेतन गांगुर्डे, वामनराव गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, युवा महानगरप्रमुख रवी पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी कामाला लागा ―
आगामी सर्व निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपसांतील हेवेदावे विसरुन प्रत्येकाने प्रेमाने पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि आपल्या गावातील संस्थेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी तन-मन-धनाने कामाला लागा, असे निर्देशही सुजात आंबेडकर यांनी यावेळी दिले. कानपिचक्या घेत सुजात अआंबेडकर म्हणाले की, राजकारण म्हटले की पाडापाडी आली. गनिमी कावे आलेत. एकमेकाचे पाय खेचणे आलेच. त्यामुळे आपण आपले कार्य करत राहून आपली प्रतिमा स्वतःच तयार करावी, आपले स्थान आपणच काम दाखवून बळकट करावे. माझ्यासोबत किंवा पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोटो व्हायरल करून किंवा स्टेटसला ठेवून आपण निवडणुकीत मते मागू शकत नाहीत. त्याने आपला पक्षही निवडून येणार नाही. त्यामुळे पक्षाचे संघटन बळकट करण्यावर भर द्या. लोकांची कामे करा, घरोघरी वंचित बहुजन आघाडी पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक स्तरावर कार्यकर्ता हाच प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व करत असतो. त्यामुळे पक्षाची आणि आपली प्रतिमा डागाळेल असे न वागता आगामी निवडणुकांमध्ये वंचितचा झेंडा फडकावण्यासाठी सामर्थ्याने आणि स्वाभिमानाने लढा, सल्लाही सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शेवटी दिला.पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, आज नाशिकमध्ये येण्याचे प्रमुख आणखी एक कारण, म्हणजे आदिवासी आयुक्तालयावर काढण्यात आलेला मोर्चा होय. अनुसूचित जाती-जमातीचा निधी इतरत्र वळविण्यात आला असून, आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे. याबाबीकडे आयुक्तांचे लक्ष वेधून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आलो. यावेळी आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन बनसोड यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले
अपघातांतील बळी; सरकारचे अपयश ―
महाराष्ट्रात झालेला बस अपघात, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील बळी, छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील भिंत कोसळून आणि विमान अपघातात गेले बळी हे सरकारचे अपयश आहे. कारण, सरकार निष्काळजी आहे. सरकार वाहतूक आणि प्रवासी सुरक्षा याबाबत उदासीन आहे. खासगीकरणाचा सर्व ठिकाणी घाट घालून ठेकेदारांना पोसण्याचे काम सरकार करत आहे. ज्या ठिकाणांवर चुकीचे बांधकाम दिसेल तिथे वंचितचे कार्यकर्ते जातील आणि संबंधितांना जाब विचारतील आणि पुढील कार्यवाही करतील असेही सुजात आंबेडकर म्हणाले.आगामी निवडणुकांची रणनीती आणि रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळून इतरांशी चर्चेस आम्ही तयार आहोत. आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा देखील लवकरच निर्णय होईल. प्रत्येक कार्यकर्ता आमचा नेता आहे. जिल्हाध्यक्ष नसतानाही आजचा मेळावा उत्साहात पार पडलाच ना. त्यामुळे कार्यकर्ते हीच आमची ताकद असून, पुढील निर्णयही लवकरच घेतले जातील. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून, कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पक्ष पोहोचवावा, त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी आपण नाशिक दौरा केल्याचेही ते म्हणाले. संजय साबळे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, मिहीर गजबे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन विश्वनाथ भालेराव यांनी केले केले.